लग्न आणि फसवणूक
बऱ्यापैकी जवळच्या नात्यातली एक बहीण माझ्याशी गप्पा मारताना म्हणाली की,माझं वय आता ३९ आहे आणि एक मुलगा जो तेरा वर्षाचा आहे. नवर्यासोबत चौदा वर्षं संसार केला. कोरोना काळात तिच्या नोकरीला पूर्ण विराम लागला म्हणून तिने पहिल्यांदाच नवर्याकडे पैसे मागितले. तिला असं वाटत होतं की, ती घर चालवते याचा अर्थ तो सेविंग्स करत असणार. पण त्याने खरंतर काहीच जमापुंजी जमवली नव्हती, हे तिच्यासाठी धक्कादायक होतं . त्याने पैसे कसेही खर्च केले होते की कमावलेच नव्हते ? तिला लग्न नन्तर असे लक्षात आले की, नवरा खरेतर ग्रॅज्युएट नाहीये. त्याने खोटं सांगितलं. तो बारावी नापास झाला आणि त्याने शिक्षण सोडलं. मग तो कुरियर कंपनीमध्ये काम करू लागला. किती काळ केलं माहित नाही. आता ताईने त्याच्यापासून दूर होत मुलाची आणि स्वतःची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ती आधीपासून अर्धवेळ क्लास चालवत होती. आता शिक्षण क्षेत्र रुळावर येतंय तशी आर्थिक घडी बसतेय.
या संपूर्ण केस मधून महत्वाचा मुद्दा अधोरेखित होतो तो म्हणजे फसवणुकीचा... माणूस माणसाला फसवतो हे अनादी काळापासून होत असावं. आपण फसवणारे होऊ नये हे खरंच. पण आपण सोबतच निदान इतके जागरूक राहायला हवे की, आपल्याला जवळची किंवा दूरची व्यक्ती फसवत असेल तर ते आपल्या लक्षात यायला हवे.
लग्न करताना काय काय पाहता येईल ??
लग्न करताना मुलाचे किंवा मुलीचे वय कागदावर तपासावे.
शारीरिक आणि मानसिक आजार काही असल्यास आधीच खरे सांगावे. व समोरच्या व्यक्तीला खरे सांगण्यास उद्युक्त करावे.
आर्थिक जबाबदाऱ्या कोण किती घेईल हे आधीच ठरवावे, संभाव्य आर्थिक धोके काय असतील याचा अंदाज ठेवावा व त्यानुसार नियोजन करावे.
नोकरीसाठी परदेशी अथवा इतर शहरात जाणार असल्यास ते आधीच स्पष्ट केलेले असावे.
दोघे कमावते असल्यास कुटुंबात दोघांनीही खर्च करावा. ज्याचे उत्पन्न कमी त्यास सूट मिळावी पण शून्य खर्च नसावा.
एकमेकांशी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्यात सातत्याने संवाद साधावा. एकमेकांना थोडा एकट्याचा निवांत मोकळा वेळही द्यावा.
आजारपणे दोघांनाही येऊ शकतात, त्याची आधीपासून तयारी ठेवावी ...
एकमेकाची फसवणूक करणार नाही अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही व पूर्ण करण्यास देखील हरकत नाही .
#असंच_काहीसं_रँडम
Comments
Post a Comment